पाचकंदील मार्केटचा होणार ‘कायाकल्प’
धुळे : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाचकंदील जवळील छत्रपती शिवाजी मार्केट, जय शंकर मार्केट, लाल बहादुर शास्त्री भाजीपाला मार्केट, फ्रुट मार्केट व धान्य मार्केट अशा पाचही मार्केटचे जुने बांधकाम पाडून त्याजागी अद्ययावत व भव्य व्यापारी संकुल उभारणार असल्याचा दृढ संकल्प भाजपाचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी केला आहे.

वर्षानुवर्षे प्रलंबित धुळे शहराचा आत्मा असलेल्या पाचकंदील भागातील पाचही मार्केटचा हा प्रश्न त्वरीत मार्गी लावला जाईल. या माध्यमातून संपूर्ण पाचकंदील परिसराचा ‘कायाकल्प’ करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आल्याची प्रक्रिया वेग धरत आहे. भाजपा महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे तथा त्यांनी दिलेल्या लेखी निवेदनाला मनपा प्रशासनाने उत्तर दिले आहे. उक्त विषया संबंधीचे लेखीपत्र व सविस्तर खुलासा मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याकडून गजेंद्र अंपळकर यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
दिपावळीच्या आगमना प्रसंगी भव्य-दिव्य नुतन व्यापारी संकुल निर्मितीचा हा संकल्प तडीस नेणारंच! शिवाय वर्षानुवर्षे धुळेकरांच्या डोळ्यात रेंगाळलेलं हे स्वप्न अखेर राज्यातील भाजपा सरकारच्या माध्यमातून साकार करण्याचा निर्धार जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी केलेला आहे… पाचकंदील परिसरातील रोजची वर्दळ व चाकरमाने व फेरीवाल्यांच्या होणाय्रा त्रासामुळे अक्षरशः जीव कोंडला जातो… आग्रारोडवरील व्यापाय्रांनी करोडो रुपये खर्च करून स्वतःच्या मालकीची उभारलेली दुकाने निष्प्रभ ठरतात.
मुळ व्यापाय्रांच्या शोरूमच्या समोर ठेलागाडी व चाकरमाने येऊन रोजच उभे ठाकतात. करोडो रुपये गुंतवून आपल्या स्वमालकीच्या साकारलेल्या शोरूम समोर दिवसभर झेलावे लागणारे अतिक्रमण काढले जावे?? या अतिक्रमणा विरोधात आग्रारोड वरील मुळ व्यापाय्रांनी अनेकदा आवाज उठविला, लेखी तक्रारी केल्यात, आंदोलने केलीत परंतू यावर कधीच कायमचा तोडगा निघाला नाही. आज सुदैवाने पाचकंदील भागातील या पाचही मार्केटचा व व्यापाय्रांचा हा प्रलंबित विषय मनपा प्रशासन व भारतीय जनता पार्टी सरकारच्या माध्यमातून लवकरंच कायमचा मार्गी लागेल. पाचकंदील जवळ अद्ययावत सर्व सोयींनी उपयुक्त भव्य-दिव्य व्यापारी संकुल उभे करण्याचा दृढ निर्धार जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी केलेला आहे.
म.न.पा. कडे 30 कोटी मागणाऱ्या ठेकेदारावरच म.न.पा. नुकसान भरपाईचा दावा लावणार. पाचकंदिल मार्केट बांधकाम न करताच मनपावर ठेकेदाराने केलेल्या तीस कोटींच्या दावा प्रकरणात आता मनपाच उलट ठेकेदारावर कोट्यवधि रुपये नुकसान भरपाईचा क्लेम करणार आहे, तसेच या ठिकाणी सुसज्ज बांधकामासाठी नव्याने व तातडीने आराखडे तयार करण्यात येत आहेत, अशी माहिती मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांना पत्रान्वये दिली आहे.
सध्या धुळे शहरात प्रस्तावित पाच कंदिल मार्केट बांधकाम प्रकरणाचा वाद गाजत आहे. ठेकेदार बोरसे ब्रदर्स यांनी कुठलेही काम झाले नसताना मनवावर ३० कोटी रुपये व अधिक व्याजचा दावा लावला आहे. त्यात कोर्ट आदेशाने लवाद नेमण्यात आला आहे. लवादासमोर सुनावणी सुरु आहे. या प्रस्तावित मार्केट मधील जुन्या गाळेधारकांनी कोर्टात धाव घेवून तेव्हा स्थगनादेश आणला होता. या जुन्या ओटे व गाळेधारकांना प्रस्तावित मार्केट मध्ये ते आहेत त्याच ठिकाणी सवलतीच्या भाडे तत्त्वावर प्राधान्याने जागा उपलब्ध करून द्यावी. अशा मागणीचे निवेदन ओटे धारकरांसह जावून गजेंद्र अंपळकर यांनी आयुक्तांना दिले होते. त्याच्या उत्तरात आयुक्तांनी या प्रस्तावित मार्केट कामाबाबत माहिती दिली आहे.

याकामी नगर विकास विभागाने दि. १९ /o ४ / २०१७ रोजी नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षते खाली समिती नेमली. समितीने दि. २८ / ०८/२०१७ रोजी चारही मार्केट चे एकत्र काम करण्याचे निर्देश दिले. आपल्या पत्रानुसार एकूण पाच मार्केट बांधणे व पत्रातील सर्व मुद्यांचा सखोल विचार करता शहरात हे सुसज्ज व्यापारी संकुल उभारणे व शहरातील नागरिकांना रोजगार मिळवून देणे कामी बांधकाम आराखडे करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात येईल. असेही मनपा आयुक्त यांनी या पत्रात म्हटले आहे.
मनपाने या प्रकरणात गांभिर्याने लक्ष घालून मनपाचे पर्यायाने धुळेकर नागरिकांचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. तसेच दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या या विषयावर विचार मंथन करुन तेथील जुन्या गाळेधारकांना सवलतीच्या शासकीय दराने गाळे – ओटे दिले पाहिजे. तसेच इतरही शेकडो बेरोजगार युवकांना तेथे सामावून घेवून रोजगार दिला पाहिजे. नवीन प्रस्तावित आराखड्यात पार्किंग, महिला-पुरुषांसाठी स्वच्छतागृहे, पाणी, कचरा विल्हेवाट, अग्नी रोधक यंत्रणा आदी सोयी होतील याबाबत दक्षता घेतली पाहिजे. अशीही अपेक्षा गजेंद्र अंपळकर यांनी व्यक्त केली.
या कामी माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे पाठबळ मिळाले. तसेच भाजपाचे वरिष्ठ नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे मार्गदर्शन लाभले.














