भाजपाच्या बुथ विजय अभियानाचा शुभारंभ, प्रत्येक बुथवर ३७० मते वाढवणार ः प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार
धुळे : शहरातून भाजपाचे लोकसभेचे उमेदवार खा. डॉ. सुभाष भामरे यांना मागील वेळी २९ हजाराचे मताधिक्य होते. यावेळी धुळे शहरात त्यांना एक लाखांचे मताधिक्य देण्याचा संकल्प भाजपाच्या टिमने केला असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी सांगितले. भारतीय जनता पक्ष हा जे बोलतो ते करणारा पक्ष आहे. पक्षाचे ते धोरणच आहे. अबकी बार ४०० पार ही केवळ भाजपाच्या कार्यकर्त्यांची नव्हे तर जनतेचीही इच्छा आहे, त्यामुळे प्रत्येक बुथवर ३७० मतं वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे तीन एप्रिलपासून राज्यभर सहादिवसीय ‘बूथ विजय अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याबाबतची माहिती प्रदेश प्रवक्ते पेशकार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत पेशकार म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ४०० पारचा नारा दिला आहे. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना प्रत्येक बूथवर गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा ३७० मते वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे मताधिक्य वाढविण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे.‘बूथ विजय अभियाना’अंतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य असून प्रत्येक बूथवर या ६ दिवसांत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत, घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर व वाहनावर स्टिकर्स लावणे, लाभार्थ्यांशी नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाचा झेंड़ा लावणे आदी उपक्रम राबवले जातील. युवा वर्ग, महिला असे समाजातील विविध घटकांसाठी ५ समूह बैठकाही घेण्यात येतील, अशी माहितीही पेशकार यांनी दिली. भाजपविरोधी समजल्या जाणार्या मतदारांपर्यंत मोदी सरकारचे कार्य, योजना पोहोचवून भाजपला मत देण्यासाठी, त्यांचे मन वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. बूथपासून दूर राहणार्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येईल.

पेशकार म्हणाले, की बूथ समिती व पन्नाप्रमुखांची नियुक्ती तसेच १०० हून अधिक जणांचा व्हॉट्स प ग्रुप बनवण्यात येईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बूथ कार्यकर्ते व पन्नाप्रमुखांचे संमेलन घेण्यात येणार असून, संमेलनाला उपस्थित प्रत्येक बूथ अध्यक्षाला त्या- त्या बूथनुसार मतांमधील वाटा किती असायला हवा, तसेच मागच्या ३ निवडणुकांमधील मतदानाची आकडेवारी व आवश्यक माहिती देण्यात येणार आहे. संमेलनामध्ये बूथ समिती व पन्नाप्रमुखांकडून अपेक्षित असलेल्या कार्यावर व जबाबदारीबाबत विस्तृत चर्चाही होतील, असेही श्री. पेशकार यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, यशवंत येवलेकर, जिल्हा प्रवक्ता श्यामसुंदर पाटील, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख जीवन शेंडगे, जितेंद्र बंब, भाजयुमोचे महानगर जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी आदी उपस्थित होते.














