मराठा आरक्षणाचा प्रश्न अजितदादाच सोडवतील : सुरज चव्हाण
धुळे : मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आम्ही निषेधच करतो. बारामतीमध्ये निघालेला मोर्चा हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधातील नव्हता. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच राष्ट्रवादीची आणि अजित पवार यांची भूमिका आहे. कोर्टात टिकणार आरक्षण मराठा समाजाला मिळेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न अजितदादाच सोडवतील, असा जनतेला विश्वास असल्याचा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केला आहे. २०२४ मध्ये अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचेही चव्हाण म्हणाले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनिमित्ताने सुरज चव्हाण हे धुळ्यात आले असून साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागणीनंतर पदाधिकाऱ्यांना नव्याने जबाबदारी सोपविण्यात आली. शहरासाठी कुणाल पवार तर ग्रामीणची जबाबदारी सुमित पवार, आशिष अहिरे यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची वाटचाल कशाप्रकारे सुरू आहे, याचा आढावा घेण्यासाठी आणि संघटन कसे मजबूत करता येईल , यासाठी आढावा दौरा आहे . संपूर्ण राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असली तरी एक पक्ष म्हणून आम्ही सरकारला महाराष्ट्र राज्य दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करू असे यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केली.
हेही वाचा













