धुळे लोकसभेची गणितं उलटली, महाविकास आघाडीला ओव्हर काॅन्फीडन्स!
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुर रेहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघाची गणितं उलटली आहेत. अल्पसंख्यांकांच्या मतांवर डोळा असणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांचा विजय निश्चित असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू असली तरी महाविकास आघाडी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये स्वतःचं नुकसान करून घेईल, असं राजकीय विश्लेषकांच मत झालं आहे. कारण महाविकास आघाडी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या भरवशावर आहे. पण कुणालबाबा केवळ आमदार आहेत, देव नाहीत. त्यामुळे शोभाताईंच्या माणसांनी हवेत उडू नये, असा फुकटचा सल्ला इथले मतदार आपल्या गप्पांमधून देत आहेत.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आयपीएस अधिकारी अब्दुर रेहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला म्हणून शोभाताई बच्छाव यांचे समर्थक आणि कार्यकर्ते खूपच हवेत उडत असल्याचे बोलले जात आहे. परंतु धुळे शहरासह मालेगाव मध्यमध्ये अशी चर्चा आहे की, त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी जास्त हवेत उडू नये. कारण वंचित बहुजन आघाडीचा अर्ज जरी बाद झाला असला तरी धुळे जिल्ह्याची जनता सुज्ञ आहे. कुणाल पाटील सांगतील म्हणून ते कुणालाही मतदान करणार नाहीत. जो उमेदवार अर्ध्या रात्री कामात येईल, त्या स्थानिक उमेदवाराला धुळे जिल्ह्याची जनता मतदान करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाल पाटील देव नाहीत; ते केवळ आमदार आहेत आणि ते स्थानिक आहेत म्हणून त्यांना इथल्या जनतेनं निवडून दिलं आहे. ते सांगतील म्हणून कोणत्याही उमेदवाराला इथल्या जनतेनं का मतदान करावं? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. कारण उद्या उठून ते पाकिस्तानातून एखादा उमेदवार घेऊन येतील आणि सांगतील की, “हा आमचा उमेदवार आहे. माझ्याकडे पाहून मतदान करा.” मग काय आम्ही मतदान करायचं का? अशी प्रश्नार्थक भावना इथल्या जनतेमध्ये आहे.विरोध व्हायला आता सुरुवात झाली आहे. आगे आगे देखो होता है क्या…? – सुनील बैसाणे, धुळे
धुळ्यात वंचितला धक्का! अब्दुर रेहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद
धुळे : लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला असून, छाननीअंती वंचितचे उमेदवार आयपीएस अधिकारी अब्दुर रेहमान यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केला आहे. या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे अब्दुर रेहमान यांनी म्हटले आहे. वंचितांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने मुस्लीम मतांचा फायदा थेट काॅंग्रेसला होणार असल्याने भाजपच्या उमेदवाराची चिंता वाढली आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने आयपीएस अधिकारी अब्दुर रेहमान यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या नोकरीच्या राजीनाम्याची चर्चा सुरुवातीपासूनच होती. असे असताना वकिलांच्या सल्ल्याने त्यांनी शेवटच्या दिवशी 3 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु शासनाने त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. ते शासकीय सेवेत असल्यामुळे लाभाच्या पदावर दिसत असल्याची त्रुटी काढून निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्ज 4 मे रोजी छाननीअंती बाद केला. अब्दुर रेहमान यांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावली होती. त्यामुळे त्यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला होता.
सन 2020 मध्ये दिला होता राजीनामा : उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर अब्दुर रेहमान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मी सन 2020 मध्ये पोलीस अधिकारी पदाचा राजीनामा दिला होता. मी राज्य शासनाचा कर्मचारी असल्याने महाराष्ट्र शासनाने माझा राजीनामा मंजूर केला आणि त्याबाबतची माहिती केंद्र शासनाला पाठविली. परंतु राजीनामा प्रस्ताव केंद्र शासनाने स्वीकारला नाही. त्यामुळे मी कॅटमध्ये अपिलात गेलो होतो. परंतु कॅटने देखील केंद्र शासनाच्या बाजूने निकाल दिल्याने मी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर याचीकेवर सुनावणी सुरू असून, पुढील तारीख सहा मे देण्यात आली आहे. सहा मे रोजी निर्णय होणार आहे.
मी कोणत्याही लाभाच्या पदावर नाही : उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी धुळे यांनी माझ्या अर्जाची आणि कागदपत्रांची खातरजमा करून अर्ज ओके असल्याचे म्हटले होते. परंतु निवडणूक आयोगाकडून या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र प्राप्त झाल्याने माझा अर्ज बाद करण्यात आला आहे. मी लाभाच्या पदावर असल्याने माझा अर्ज बाद केल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पण मी कोणत्याही लाभाच्या पदावर नाही. मी नोकरी करत नाही, नोकरीचा पगार मला मिळत नाही, माझ्याकडे कोणतेही शासकीय वाहन अथवा शासकीय निवासस्थान नाही. त्यामुळे मी शासनाचा कोणताही लाभधारक नाही. म्हणून निवडणूक आयोगाने माझा अर्ज बाद करण्याचा दिलेला निर्णय नियमबाह्य असून, या विरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे अब्दुर रेहमान यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा थेट फायदा : धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव मध्य आणि धुळे शहर या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये एमआयएमचे आमदार आहेत. असे असले तरी एमआयएमने उमेदवार दिलेला नाही. मुस्लिम मतदारांची संख्या लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीने अब्दुर रेहमान या मुस्लिम उमेदवाराला संधी दिली होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांची विभागणी होणार होती आणि त्याचा थेट लाभ भाजप महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना होणार होता. परंतु अब्दुर रेहमान यांचा उमेदवारी बाद झाल्याने धुळे लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम मते काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना मिळतील असे बोलले जात आहे.