‘वंचित’चे उमेदवार जितुभाऊ शिरसाठ यांच्या सभेला अफाट गर्दी
धुळे : धुळ्यात 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी साक्री रोडवरील संघमा चौकात वंचित बहुजन आघाडीची भव्य निर्धार सभा झाली. माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांनी ‘वंचित’च्या नेत्या रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या या सभेला शिरसाठ यांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांनी, युवकांनी आणि महिलांनी अफाट गर्दी केली होती. ही गर्दी पाहून ‘वंचित’च्या नेत्यांनी जितुभाऊ शिरसाठ यांचं तिकीट जवळपास फायनल केलंय.

एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून दानधर्म केला जात असला, तरी दुसरीकडे मात्र महिलांवरील अत्याचार रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी धुळ्यात केली. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील अशी घोषणा त्यांनी केली. पक्षातर्फे लवकरच त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या.

निर्धार सभेला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन गायकवाड, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ, डॉ. कृष्णमोहन सैंदाणे व्यासपीठावर उपस्थित होते. तर चंद्रमणी लभाने, आबासाहेब खैरनार, बौद्धाचार्य सुरेश लोंढे, वंचितचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, भगतसिंग राजपूत, चंद्रमणी वाघ, योगेश पगारे, युवा नेते धनराज शिरसाठ, पूनमताई शिरसाठ, किरण धिवरे, प्रविण शिरसाठ, सतिष अहिरे, प्रेम शिरसाठ, ऋतुराज वाघ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
आरक्षण वाचवायचे असेल तर ‘वंचित’शिवाय पर्याय नाही : बनसोडे : सर्वजित बनसोडे म्हणाले, काँग्रेस आणि भाजपने वंचितांच्या आरक्षणाची नसबंदी केली आहे. त्यामुळे आपले आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही. वंचित बहुजन आघाडी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात आहे. मात्र मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या भूमिकेला वंचितचे समर्थन आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजपची सत्तेची मस्ती उतरवली. म्हणूनच आता जनतेला गोंजारण्यासाठी लाडकी बहीणसारख्या योजना सुरू केल्या आहेत. मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी भाजपला त्यांची जागा दाखवून देईल.

दानधर्म करू नका, महिलांना स्वाभिमानी बनवा : रेखाताई ठाकूर : यांचा सरकारला टोला रेखाताई ठाकूर म्हणाल्या, दानधर्म करणे हे सरकारचे काम नाही. पण तरीही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार दानधर्म करीत आहे. दुसरीकडे महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना या घटना रोखण्यात सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. जनता अनेक प्रकारे टॅक्स भरते. टॅक्सच्या पैशातून सरकारची तिजोरी भरली जाते. त्या तिजोरीच्या पैशातून महिलांना स्वावलंबी व स्वाभिमानी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडून हा तिजोरीचा पैसा लाडक्या बहिण योजनेच्या माध्यमातून उधळला जात आहे. सरकारकडे आता कुठलाही कृती कार्यक्रम राहिलेला नाही. म्हणून लाडकी बहिण योजना आणली आहे. लोकसभेच्या निवडणुकीध्ये मोदींना प्रचंड बहुमताची अपेक्षा होती. परंतु महाराष्ट्रातील जनतेने मोदी आणि त्यांच्या भाजपला सपशेल नाकारले. कारण मोदी सरकार हे संविधान संपवायला निघालेलं होतं. मात्र जनतेने मोदींना लोकसभेत चांगलाच धडा शिकवला. आता विधानसभा निवडणुकीत वंचितच्या माध्यमातून राज्यातील सरकारला जनता धडा शिकवेल.













