पाण्यासाठी कापडणे ग्रामस्थांचे ‘घागर नळाला लाव’ आंदोलन
धुळे (प्रतिनिधी) : धुळे तालुक्यातील कापडणे ग्रामपंचायतीने १७ लाख रुपये खर्च करून उभारलेला आरओ फिल्टर प्लांट वर्षभरापासून बंद असल्याने पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून ग्रामस्थ वंचित आहेत. याविरोधात स्वच्छ पाणीपुरवठा संघर्ष समितीच्या वतीने रविवारी (दि. 23 ऑगस्ट 2026) ‘घागर नळाला लाव’ आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांनी सुरुवातीला फिल्टर प्लांटचे पूजन करून नळाला प्रतीकात्मक घागर लावली आणि जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
एका महिन्यात प्लांट सुरू करण्याचे आश्वासन गेल्या वर्षी दिले होते. मात्र ते न पाळल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर काम सुरू झाले असले तरी जळालेल्या मोटारी आणि दुरुस्ती दरम्यान कर्मचाऱ्याला लागलेला विजेचा धक्का यांमुळे यंत्रणेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तसेच अधिकृत प्रयोगशाळेतून पाण्याची गुणवत्ता तपासणी करून ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यावरच पाणीपुरवठा सुरू करावा आणि तांत्रिक व विद्युत सुरक्षेची खात्री करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आंदोलनस्थळी अधिकारी व ठेकेदार गैरहजर राहिल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत ठोस कारवाई होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा नवल पाटील, विश्वासराव देसले आणि इतर ग्रामस्थांनी दिला आहे.












